आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अन्नभेसळविरोधी कारवायांना वेग, राज्यभर धडक मोहिमेत २०३ आस्थापनांवर कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्नभेसळ, बनावट खाद्यपदार्थ निर्मिती आणि बंदी घातलेल्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी धडक मोहीम सुरू केली असून गेल्या काही आठवड्यांतील कारवाईत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून ८६ आस्थापने सील करण्यात आली आहेत. तसेच १०२ आरोपींना अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त आणि बंदी घातलेला माल जप्त करण्यात आला आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली “सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र” अभियानांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान सर्वाधिक कारवाई गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारीच्या बेकायदेशीर साठ्यांवर करण्यात आली.

राज्यात विक्रीस बंदी असतानाही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि वितरण सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय भेसळयुक्त दूध, पनीर, मावा, तूप, खाद्यतेल, मसाले तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचेही उघड झाले.

काही ठिकाणी कृत्रिम रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा मालावरही जप्तीची कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे ते ३१ मे या कालावधीत राज्यभरातील २०३ आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे १.५८ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त खाद्यसाठा जप्त करण्यात आला.

याशिवाय जून महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आणखी ५० ठिकाणी छापेमारी करून ३.६७ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा बंदी घातलेला आणि निकृष्ट दर्जाचा माल जप्त करण्यात आला.

या कारवाईत १७ जणांना अटक करण्यात आली तर ८ आस्थापने सील करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत ३.९५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे भेसळयुक्त व बंदी घातलेले पदार्थ जप्त करण्यात आले.

या मोहिमेत २१ जणांना अटक करण्यात आली असून १७ आस्थापनांवर टाळे ठोकण्यात आले आहे. राज्यभरातून जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, निकृष्ट दर्जाचे दूध, पनीर, खाद्यतेल, मसाले, मावा आणि विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

पुणे विभागातही एफडीएने मोठी कारवाई करत दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ३७ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा भेसळयुक्त व बंदी घातलेला माल जप्त करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी परवान्याशिवाय अन्ननिर्मिती सुरू असल्याचे आढळून आले असून संबंधित आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अन्नभेसळ ही केवळ कायद्याचा भंग करणारी बाब नसून ती थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे.

त्यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जात आहे. आगामी सण-उत्सव आणि वाढत्या बाजारपेठेतील मागणीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार असून अचानक छापे, नमुना तपासणी आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची मुदत, गुणवत्ता, उत्पादकाची माहिती आणि अधिकृत परवाने तपासावेत तसेच भेसळीबाबत संशय आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी ही मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.