तपासाऐवजी विश्रामबाग पोलिसांची पर्यटनस्थळी मौजमजा
पोलीस उपनिरीक्षकासह तिघांची वेतनवाढ रोखली : अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांचा आदेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिलेला सोबत घेऊन तपास करण्याऐवजी सातारा येथील पर्यटनस्थळी मौजमजा करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मध्यरात्री एक वाजता पुण्यात परत आल्यानंतर या पोलिसांनी फिर्यादी महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर एकटीला सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस अंमलदार कोमल कांबळे अशी शिक्षा झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
हे तिघेही विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्त होते. फिर्यादी महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे यांच्याकडे होता.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी महिलेला स्वारगेट एसटी स्थानकात बोलावण्यात आले.
प्रत्यक्षात मात्र तिला सोबत घेऊन हे तिघेजण सकाळी साडेदहा वाजता खासगी वाहनाने सातारा येथे गेले. सातारा येथे पोहोचल्यानंतर नाईकवाडे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला कळवून त्यांची मदत घेऊन तपास करणे आवश्यक होते.
मात्र, तसे न करता त्यांनी तेथील कणसे ढाब्यावर हजेरी लावली. त्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजता ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. पंचनामा करण्यासाठी गेले असताना आजूबाजूच्या रहिवाशांकडे किंवा घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडे कोणतीही चौकशी केली नाही.
घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी तत्काळ पुण्याकडे परतणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता त्यांनी साताऱ्याजवळील कास पठार व इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.
फिर्यादी महिलेने आपली आई आजारी असून ती घरी एकटी असल्याने लवकर घरी जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
चौकशीत त्यांनी प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेतल्याचे निष्पन्न झाले. परत येताना पोलीस अंमलदार कोमल कांबळे यांच्या सातारा येथील निवासस्थानी जेवणासाठी थांबले.
त्यानंतर मध्यरात्रीनंतर एक वाजता ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर फिर्यादी महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी सुरुवातीला तिला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महिलेने विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर मध्यरात्री एकटीला सोडण्यात आले.
महिलेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार – या प्रकारानंतर संबंधित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या अहवालात महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघांनी सातारा येथे जाऊन कोणत्याही प्रकारचा सखोल तपास न करता केवळ मोघम स्वरूपाचा तपास केला आणि तेथील पर्यटनस्थळांना भेट देण्यात वेळ घालविल्याचे नमूद करण्यात आले. फिर्यादीला तपासासाठी सोबत घेऊन जाऊनही तिच्या गुन्ह्याचा योग्य तपास न करता केवळ मौजमजा केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. या अहवालाशी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सहमती दर्शविली. त्यानंतर संबंधित पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांनी त्यांचा खुलासा सादर केला; मात्र तो असमाधानकारक असल्याने अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले.
तुमच्या कर्तव्यामध्ये अंत्यत बेशिस्त, बेजबाबदार, निष्काळजीपणाचे, हलगर्जीपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल, असे वर्तन करुन कर्तव्यात अक्षम्य अशी गंभीर चुक केल्याचे निष्पन्न होत असल्याने पुढील देय वार्षिक वेतनवाढ २ वर्ष कालावधीतसाठी अपरिणामकाररित्या रोखणे ही शिक्षा देण्यात आली आहे.
