शेतकऱ्यांनी पिकविमा मिळण्यासाठी नुकसानीची माहिती तातडीने कळवावी – खा. ओमराजे निंबाळकर

शेतकऱ्यांनी पिकविमा मिळण्यासाठी नुकसानीची माहिती तातडीने कळवावी – खा. ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद: जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीना कळविलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ती तातडीने कळविण्याचे अवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता राज्य सरकार सरसकट मदत जाहीर करत आहे मात्र पिकविमा कारणे देऊन मदत देण्याचे टाळत असते.
त्यामुळे गेल्यावर्षी ज्या प्रकारामुळे त्यानी शेतकऱ्यांना मदतीपासुन वंचित ठेवले आहे, त्याचा विचार करुन यंदा ती प्रक्रियासुध्दा पुर्ण करणे आवश्यक आहे. यंदा सहा लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरुन आपले पिक संरक्षित केले आहे. मात्र नुकसानीची माहिती कळविण्याऱ्यांची संख्या अवघी दोन लाख 27 हजार एवढीच आहे. सरसकट मागणीची दखल सरकार घेईल असा विश्वास व्यक्त करुन खासदार राजेनिंबाळकर यांनी भरीव मदत पिकविम्याच्या माध्यमातुन मिळण्यासाठी आपण कुठेही कमी पडता कामा नये.
यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ भरुन देण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडुन शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणारच आहे, गेल्यावर्षीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मदत दिलेली होती. यंदाही त्यानी आश्वासन दिले आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री असल्याने त्या मदतीबाबत आपल्या मनात शंका नसल्याचे खासदारांनी बोलुन दाखविले आहे.
पिकविमा कंपन्या या मुजोर आहेत, गेल्यावर्षी त्याचा अनुभव राज्य सरकारला व शेतकऱ्यांना आला आहे. आपल्याला अधिकाधिक मदत मिळण्यासाठी जे काही करता येईल ते आपल्याला करावे लागणार आहे. पिकविमा कंपनीने 72 तासात नुकसानीची माहिती कळविण्याचे जे अवाहन केले आहे, त्यानुसार आपण ती माहिती कंपन्याना ऑनलाईन अथवा ऑफलाईन कळविण्याची आवश्यकता आहे.