महाराष्ट्र जैन वार्ता : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : दिगंबर सरोवरचे राजहंस संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना दिगंबर जैन मंदिर बार्शी येथे आंतरराष्ट्रीय सामूहिक विनयांजली अर्पण करण्यात आली. सकल दिगंबर जैन समाज बार्शी तर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 18 फेब्रुवारी 2024 चंद्रगिरी,डोंगरगड (छत्तीसगड) मध्ये समतापूर्वक समाधी मरण त्यांनी घेतले. प.पू.आचार्यश्रीजी हे नेहमीच ज्ञान, समता आणि करुणा त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जात होते.
त्यांचे जीवन जैन धर्मांच्या मूलभूत तत्वांचे मूर्तीमंत जागतिक उदाहरण होते. त्यांनी कधीही कुठल्याही धर्माचा जातीभेद केलेला नाही. त्यांच्याकडे सर्व जाती-धर्माचे, पंथाचे लोक येत असत.
भारतातील सर्व जैन समाज त्यांना सध्याच्या युगाचे देव मानत असत. त्यांनी आपल्या आहारचर्या मध्ये गोड,आंबट, तळलेले पदार्थ,फळ, मीठ, हिरव्याभाज्या अशा अनेक वस्तूंचा आजीवन त्याग केला होता.
त्यांच्या देहगमनाने संपूर्ण जैन समाजाने हळहळ व्यक्त केली. आज जैन मंदिर येथे त्यांना सर्वांनी सामूहिक विनयांजली अर्पण केली. यावेळी आचार्यश्रीजींच्या प्रतिमेचे अनावरण, मंगलाचरण अष्टक, पूजन, आरती करण्यात आली.
तसेच श्रीजींच्या तैलचित्राची मिरवणूक घेण्यात आली. यावेळी श्रावकां बरोबर श्राविकांनीसुद्धा उपस्थित राहून आचार्यश्रीजींचे आशीर्वाद घेतले. तसेच लहान मुलांनी व श्रावक-श्रविकांनी आचार्यश्रींच्याबद्दल आपले मत व्यक्त केले.
यावेळी दिलीप गांधी,अनिरुद्ध अन्नदाते, जयप्रकाश दोशी, प्रवीण मांडवकर, जवाहर दोशी, चंद्रगुप्त गांधी, हेमंत पलसे, सुधीर काळेगोरे,राहुल दोशी, शितल गांधी, ऋषिकेश देवधरे, रुपेश देवधरे, सम्मेद तरटे, रीना शहा ममता कुरमुडे, विजया कळसकर, डॉ.वैशाली मोहिरे, दीपा येवनकर, नीलम दोशी, प्रियंका शहा, सविता देवधरे, एकता जैन महिला मंडळ, समता जैन महिला मंडळ, तसेच बालगोपाळ ते वृद्धापर्यंत शेकडो श्रावक-श्राविका उपस्थित होते.
