आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जया किशोरी यांचे व्यक्तिमत्व व अध्यात्मिक कार्य नव्या पिढीसाठी आदर्श

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 25, 2024
Spread the love

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरीजी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. अध्यात्म आणि प्रेरणादायी वक्तृत्व क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यात आयोजित सोहळ्यात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते जया किशोरी यांना सन्मानचिन्ह, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थीर्नींनी बनविलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पुरस्काराचा नम्रपणे स्वीकार करत जया किशोरी म्हणाल्या, “पंचवीस वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या ‘सूर्यदत्त’ संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार अभिमानास्पद आहे. विविध ज्ञानशाखांसोबत विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीण शिक्षण दिले जातेय, हे महत्वाचे आहे. आज युवकांना आध्यत्मिकतेची सर्वात जास्त गरज आहे.

भौतिकवादी जगण्याला अध्यात्मिकतेची जोड दिली, तर जीवन अधिक सुसह्य होईल. शिकत राहणे हा परिवर्तनाचा नियम आहे आणि हे मूल्य सूर्यदत्त संस्थेत रुजवले जाते, याचा आनंद वाटतो.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जया किशोरी या एक भारतीय आध्यात्मिक वक्त्या, गायिका, प्रेरक वक्त्या, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारणावादी नेत्या आहेत.

त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी लाखो भक्तगण आसुसलेले असतात. ‘किशोरीजी’ आणि ‘आधुनिक युगातील मीरा’ म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीचा सन्मान करताना सूर्यदत्त परिवाराला आनंद होत आहे. त्यांच्या आदर्श कार्यातून ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”


आपल्या उत्कृष्ट कार्यातून समाजात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. उत्कृष्टता हे ‘सूर्यदत्त’चे वैशिष्ट्य असून, गेल्या अडीच दशकांच्या प्रवासात ‘सूर्यदत्त’ने २००३ पासून हा पुरस्कार सुरु केला आहे.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात परिवर्तनवादी अमूल्य योगदाना देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आजवर सन्मानित करून विद्यार्थी, पालक आणि समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यामागे आहे.

पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंजन, योगाचार्य पद्मभूषण डॉ. बीकेएस अय्यंगार, प्रख्यात अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर, पद्मभूषण शिव नाडर, माजी पोलीस अधिकारी किरण बेदी, पद्मविभूषण मोहन धारिया, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आध्यात्मिक आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे, असे स्नेहल नवलखा यांनी नमूद केले.