धनुर्मास निमित्त माँ आशापुरा माता मंदिरात भक्तिमय वातावरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिरात धनुर्मास निमित्त श्री गोदम्बाजी-रंगनाथजी विवाह सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. शनिवारी हळदी, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला तर रविवारी मुख्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
धनुर्मास हा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात माता गोदादेवी भगवान विष्णूंना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी उपवास करते आणि उपासनेनंतर धनुर्मासाच्या २७व्या दिवशी भगवान विष्णू तिच्याशी विवाह करतात, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
या मंगल प्रसंगी भाविक सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि गोदादेवीची पूजा करतात. विष्णू सहस्त्रनाम, भजन-कीर्तन आणि धार्मिक मंत्रांचे पठन यादरम्यान केले जाते. या काळात गोदा रंगनाथ कल्याण उत्सवाचे विशेष महत्त्व असते, आणि विविध राज्यांमध्ये हा विवाह सोहळा उत्साहात साजरा केला जातो.
माँ आशापुरा मंदिरात झालेल्या विवाह सोहळ्यात वरपक्षात गोपालकृष्ण अगरवाल आणि संगीता अगरवाल तर वधूपक्षात राजेश मेहता, मीना मेहता आणि विशाल मेहता सहभागी झाले होते. मामा-मामी म्हणून राजेश सोनी आणि जागृती सोनी यांनी सहभाग घेतला. मंदिर ट्रस्टच्या वतीने चेतन भंडारी, भारती भंडारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हा दोन दिवसीय विवाह सोहळा ११ आणि १२ जानेवारी रोजी संपन्न झाला. यासाठी दिलीप मुनोत, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
