प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’तर्फे महिनाभर ‘सूर्योत्सव’
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे आहे. त्यांच्या ओजस्वी भारतीय संस्कृती व ऐतिहासिक वारशाची ओळख करुन देण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सूर्योत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले बांधणी, संरक्षण दलातील करिअर संधी, तसेच विविध तंत्रज्ञान क्षेत्रांची ओळख करून दिली जाते. संस्थेच्या स्थापनेपासूनच सर्वांगीण विकासासाठी योग, प्राणायाम, कराटे प्रशिक्षण आणि ‘एआय’ आधारित शिक्षणावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“संपत्ती व पायाभूत सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून, उभरत्या उद्योजकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच समाजातील तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. भारतीय संस्कृती, कुटुंब पद्धती आणि मूल्यांची जपणूक नव्या पिढीत रुजवणे हे काळाची गरज आहे,” असेही चोरडिया यांनी नमूद केले.
प्रशांत पितालिया यांनी संस्थेच्या परिपूर्ण आणि परिवर्तनशील विद्यार्थी घडविण्याच्या भूमिकेवर भर दिला, तर केतकी बापट यांनी विविध उपक्रमांमुळे संस्थेचे विद्यार्थी उठून दिसत असल्याचे मत व्यक्त केले.
