डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत : ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२५’चे वितरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आंतरराष्ट्रीय मानव संसाधन (एचआर) दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२५’चे वितरण करण्यात आले. प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते मानव संसाधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या पाच मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. मानव केवळ संसाधन नव्हे; अमर्याद क्षमतेचा स्रोत असून,कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवाच्या अमर्याद क्षमतेचेच फलित असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या सोहळ्यात प्लुरल टेक्नॉलॉजीच्या सहयोगी उपाध्यक्षा (एचआर) सुरेखा बनकर, आयवा सोल्युशन्सचे एचआर हेड श्रेयस लोणी, आयसोर्स इन्फो सिस्टिम्सचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. सुधींद्र सरनोबत, एचआर हेड मंजिरी कुलकर्णी, प्रधान संशोधक व फॉरेन्सिक तज्ज्ञ आरती पुरुषोत्तम यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, महासंचालक डॉ. एस. रामचंद्रन, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संगणक विभागप्रमुख डॉ. मनीषा कुंभार आदी उपस्थित होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असते. अद्ययावत तंत्रज्ञान, बदलती कार्यपद्धती याला समरस अशा कर्मचाऱ्यांची निवड करण्याची जबाबदारी मानव संसाधन विभाग अर्थात ‘एचआर’वर असते.
त्यामुळे कोणत्याही उद्योगाच्या प्रगतीमध्ये मानव संसाधन विभागाचे योगदान महत्वाचे असते. कंपनीच्या हिताच्या दृष्टीने चांगली माणसे निवडण्याचे कसब ‘एचआर’कडे असते. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हायला हवा.
तंत्रज्ञानाच्या युगातही ‘एचआर’च्या भावनिक स्पर्शाला तितकेच महत्व आहे. कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण, सर्वांचे समाधान करण्याचेही दायित्व त्याच्यावर असते. त्यामुळे चांगला मानव संसाधन व्यवस्थापक होण्यासाठी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्याला प्राधान्य द्यावे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला जोडणारा हा कार्यक्रम असून, ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड’मधून मानव संसाधन क्षेत्रातील आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विद्यार्थ्यांना सर्वांगीण, रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’ने नेहमी भर दिला आहे. शैक्षणिक कार्याबरोबर समाज घडण्यासाठी आवश्यक गोष्टी सातत्याने आम्ही करतो.
मानव संसाधन व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट) हे कौशल्याचे काम आहे. त्यामुळे ‘एचआर’ म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी यासाठी लागणारी कौशल्ये विकसित करावीत. कारण कंपनीत अचूक व योग्य व्यक्तीची निवड करणे ‘एचआर’मुळेच शक्य होते.”
सन्मानित करण्यात आलेल्या सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. सुरेखा बनकर यांनी आधुनिक एचआर प्रणालीचा आढावा घेत स्वीकार्यता हा चांगल्या एचआरचा यशोमार्ग असल्याचे नमूद केले.
सध्याच्या कार्यशैलीत ‘एचआर’चा दृष्टीकोन व विचार कसा असायला हवा, याविषयी श्रेयस लोणी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुधींद्र सरनोबत यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी एक समाधानकारक अनुभव निर्माण करण्यासाठी, तुम्हाला त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
नव्या पिढीशी संवाद साधण्यासह झपाट्याने बदलणाऱ्या जगाचे वास्तव स्वीकारण्याचा कानमंत्र मंजिरी कुलकर्णी यांनी दिला. ऑपरेशन्स व रिलेशन्स मॅनेजर स्वप्नाली कोगजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.
