महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “जैन धर्म हा अनादी काळापासून चालत आलेला प्राचीन आणि पूर्णतः स्वतंत्र धर्म आहे. याचा कोणताही निर्माता किंवा संस्थापक नाही,” असे स्पष्ट मत प्रख्यात कथाकथनकार व कीर्तनकार अंजली सतीश शहा यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत जागृती मंच, पुणे यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक प्रित्यर्थ आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
महावीर प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड होते. शहा पुढे म्हणाल्या, “जो जीवांना सुख प्राप्त करून देतो, तो जैन. जैन धर्माचा इतिहास ऋग्वेद आणि महाभारतासारख्या ग्रंथांमध्येही आढळतो.
ऋषभदेवांचा उल्लेख या ग्रंथांतून स्पष्ट होतो. १९२७ मध्ये न्यायालयीन निर्णयाद्वारेही जैन धर्म स्वतंत्र असल्याचे सिद्ध झाले, तरीही आपण हे जागतिक पातळीवर पोहचवण्यात कमी पडलो. जिओ और जिने दो हा जैन संस्कृतीचा आत्मा आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली. प्रास्ताविक अरिहंत जागृती मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांनी केले. त्यांनी नवकार महामंत्रात घुसखोरी, त्रिमंत्राचा चुकीचा प्रचार आणि जैन धर्मावर होणाऱ्या अतिक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.
कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी मंचाच्या २१ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. निबंध स्पर्धेचे परीक्षक अर्जुन निर्वाण यांनी उत्कृष्ट निबंधांचे विवेचन केले. त्यांनी सांगितले की, १४६ स्पर्धकांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व कर्नाटकमधून सहभाग घेतला. १४ ते ८० वयोगटातील स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.
अध्यक्षीय समारोपात विलास राठोड म्हणाले, “जैन धर्म हा विज्ञानावर आधारित धर्म आहे. मानव कल्याणासाठी यातील मूल्ये जपली पाहिजेत. हा धर्म इतर कोणत्याही धर्माची शाखा नसून पूर्णपणे स्वतंत्र आहे.
अरिहंत जागृती मंच या दृष्टिकोनातून उत्तम कार्य करत आहे. त्यांच्या उपक्रमासाठी आवश्यक ती सर्व मदत मी करीन.” सूत्रसंचालन अजय ललवाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव प्रदीप फिरोदिया यांनी मानले.
उपाध्यक्ष विजय पारख, शांतिनाथ जैन व सचिव संतोष भन्साळी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मंचाचे सदस्य संजय चोरडिया, शांतीलाल नवलखा, जवाहर गुमते आणि अमित जोगी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमात ‘जैन धर्म – प्राचीन स्वतंत्र धर्म’ या हिंदी पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना मंचातर्फे सन्मानित करण्यात आले. समारंभाला पुण्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, श्रावक, श्राविका तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अरिहंत जागृती मंचाच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.
