अरिहंत जागृती मंच, पुणे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक दिवशी भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली जाते. जैन समाज हा अल्पसंख्याक समाज असून या समाजाच्या धार्मिक सण-उत्सवांसाठी संपूर्ण वर्षात ही एकमेव अधिकृत सुट्टी असते.
मात्र काही शाळा व शैक्षणिक संस्था, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या संस्था, या दिवशी सुट्टी देत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. यासाठी मागील वर्षी अरिहंत जागृती मंच, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
त्यावेळी मा. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकाच्या आधारे मंचाने सुट्टी न देणाऱ्या शाळांना निवेदन देऊन सुट्टी देण्याची विनंती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन पुणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळांनी पहिल्यांदाच भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी जाहीर केली होती.
यावर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी त्या दिवशी सुट्टी द्यावी, यासाठी अरिहंत जागृती मंच, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात शासनाने अधिकृत पत्रक काढून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश द्यावेत तसेच ज्या संस्था किंवा शाळा सदर दिवशी सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी अरिहंत जागृती मंचाचे अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांच्यासह श्रीपाल ललवाणी, नितीन जैन, विजय पारख, जवाहर गुमते, संतोष भंसाळी आणि नितीन शहा उपस्थित होते.

















