अभय प्रभावना येथे सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी
सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या १३० विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व आध्यात्मिक अभ्यासदौरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह संस्कारक्षम आणि मूल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी ‘अभय प्रभावना’ या सुप्रसिद्ध संग्रहालयाला भेट देत भारताचा समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा प्रत्यक्ष अनुभवला. सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या वतीने या विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी परस्परसंवादी प्रदर्शने, शिल्पकला, कलाकृती आणि अत्याधुनिक दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने भारताचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जवळून अनुभवला. शांतता, करुणा, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत, तत्त्वज्ञ आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शित फेरफटका आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या अनुभवातून त्यांच्या सांस्कृतिक जाणिवा अधिक समृद्ध झाल्या असून चौकस विचारसरणीला चालना मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
अशा प्रत्यक्ष अनुभवांमुळे वर्गातील शिक्षण अधिक परिणामकारक ठरते आणि विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीस बळ मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांकडे केवळ ज्ञान नव्हे, तर संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि आत्मिक बळ असणे आवश्यक आहे.
या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वारशाबरोबरच शिस्त, सहकार्य, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम यांसारखी जीवनमूल्ये आत्मसात केली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवाधारित शिक्षणाची परंपरा भविष्यातही सुरू ठेवत त्यांना ज्ञान, संस्कार आणि राष्ट्राभिमानाची अमूल्य शिदोरी देण्याचा सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा संकल्प असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, इतिहास आणि मानवी मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, या उद्देशाने या अभ्यासदौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यात राष्ट्रभक्ती, मानसिक कणखरता, संवेदनशीलता आणि उत्तम संस्कार रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
