आनंद दरबारच्या प्रांगणात वारकऱ्यांची मांदियाळी
विठ्ठल नामाच्या गजराने दत्तनगर परिसर दुमदुमला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांचे पुण्यातील विविध भागांत मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर दत्तनगर-आंबेगाव येथील आनंद दरबारमध्ये वारकरी दिंड्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. “साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा” या अभंगाची अनुभूती देणारा हा सोहळा भक्तिभावाने पार पडला.
यावेळी भैरवनाथ कृपानाद दिंडी (तळिये), ह.भ.प. मृदंगविशारद हरिदास महाराज पांचाळ (वडवणी-सोन्नाखोटा) यांच्या दिंडीसह ह.भ.प. नामदेव महाराज गेवराईकर यांच्या दिंडीचे आनंद दरबारमध्ये आगमन झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि अखंड हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण दत्तनगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दिंड्यांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, देवीदास जाधव, पांडुरंग नांदे, दत्तात्रय देशमुख आणि सारिका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष पिरगळ, प्रकाश भटेवरा, संतोष भंडारी, संतोष दुगड, दिलीप संचेती,सविता बाबर, संतोष निगडे, सुभाष लूनावत, प्रमोद रांका, राहुल शहा, योगेंद्र रनवीर आणि आनंद दरबारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
