आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार, दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 20, 2026
Spread the love

नाशिक : राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यंदाची दिवाळी साजरी न करता बेमुदत व साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने दिला आहे. शासन आणि उच्च न्यायालय प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.

राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शासन आणि उच्च न्यायालय प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाची वेळ आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम यांनी केला.

निकम यांनी सांगितले की, न्यायालयीन कर्मचारी हे न्यायदान प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असूनही त्यांच्या वेतनश्रेणी, पदोन्नती, सेवा नियम आणि इतर प्रशासकीय मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार वेतन व सेवा सुविधांबाबत आवश्यक निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यामुळे न्यायालयीन कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यंदाची दिवाळी साजरी न करता राज्यभर बेमुदत उपोषण आणि साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.