पुण्याच्या विकासासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन गतिमान करा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना : वाहतूक, पाणी, पर्यावरण व पर्यटनाला प्राधान्य
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विस्तार आहे.
पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर :- पुणे इनर रिंग रोड, सीएमपी (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
माण-हिंजवडी मेट्रोला गती देण्याचे निर्देश :- माण-हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. २३ स्थानकांच्या या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, आणखी पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य :- पुणे महानगर प्रदेशातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश देण्यात आले. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, संबंधित यंत्रणा आणि संस्था स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्च भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
अग्निशमन केंद्रांचे जाळे मजबूत करणार :- पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेऊन अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना आवश्यक ती गती देऊन पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याचे दीर्घकालीन नियोजन :- पीएमआरडीए क्षेत्रात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवावा. त्यासाठी नवीन जलस्रोत उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
सर्वंकष विकासावर भर :- पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा. त्यासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन अधिक गतिमान करून विकासकामांना नियोजनबद्ध गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
