वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनातून संदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : एखादी नदी एका विशिष्ट दिशेने वाहत असते त्याप्रमाणे आपल्या शरीराचाही एक प्रवाह असतो. तो विपरित दिशेने वाहत नाही. ज्या वेळी आपल्या मनात राग येतो तेव्हा तो एकाच दिशेने वाहतो. परंतु जेव्हा आपण एखादा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो. दिव्यासारखा चहुबाजूंनी उजळून टाकण्याचे काम धर्म करतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित केलेली आहे. भाविक मोठ्या संख्येने त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते. यावेळी प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनी ही मार्गदर्शन केले.
पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, तीर्थंकरांचे जीवन हे एखाद्या दिव्यासारखेच आहे. ते सर्वत्र प्रकाशाने उजळून टाकतात. आपल्याही जीवनात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या प्रवाही असतात. क्रोध एका दिशेने वाहतो आणि करुणा, प्रेम मात्र सगळीकडे पसरतात. कशाय म्हणजे प्रवाह आहे आणि धर्म म्हणजे दिवा आहे.
कारण त्याने आपले अंतरंग उजळून निघतात. विचारांमध्ये, शब्दांमध्ये, व्यवहारात भक्तीचा प्रवाह असणे गरजेचे असते. जेव्हा करुणा व प्रेम असते तेव्हा त्याचा प्रकाश सारे काही उजळून टाकतो. कशाय एकाच प्रवाहात वाहतो. धर्म मात्र एकाच दिशेने वाहत नाही तर समग्रतेने आपले भवताल उजळून टाकतो.
गती आणि दिशा दोन्ही देण्याचे काम प्रकाश करतो तेच काम धर्म करतो. प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, पूर्वजन्मातील संचित कर्मातील उपकारांमुळे आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. जो सतत धर्माचा विचार करतो त्याच्या जीवनात धर्म उतरलेला असतो.
त्याप्रमाणे सम्यक दर्शनाची यात्रा करताना ते केवळ तत्त्वज्ञानाच्या पातळीवर राहून चालत नाही ते जीवनातही उतरावे लागते. या मार्गावर आपली अतूट श्रद्धा असणे आवश्यक आहे. श्रद्धा केवळ बोलण्या पुरती नसावी ती प्रत्यक्ष जीवनात उतरलेली असावी. जेव्हा आत्म्याला अनुभव मिळेल तेव्हा श्रद्धा प्रस्थापित होते.
श्रद्धा असते तेव्हाच अनुभव मिळत जातो. असा अन्योन्य संबंध लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या विश्वासाने आणि श्रद्धेने मी या मार्गावर निघालो आहे. त्यावर कोणतीही शंका न घेता मी यापुढेही चालत राहणार आहे. फूटभर खोदून पाणी लागेल का ? तर लागणार नाही.
आपण खोदत खोदत अधिक खोल जाऊ तेव्हाच पाणी लागणार आहे. त्यामुळे श्रद्धा वरवरची असून भागणार नाही. ती सुद्धा सखोल असावी लागेल. बाहेरून गुरू मार्ग दाखवतील, दिशा दाखवतील पण चालायचे आपल्यालाच आहे. त्यामुळे श्रद्धापूर्वक आपण त्या मार्गावर चालत राहणे महत्त्वाचे आहे.
जितक्या दृढतेने आणि विश्वासाने आपण चालत राहू तेव्हा आपल्याला आपले ध्येय साध्य होईल. त्यासाठी निःशंकता महत्त्वाची आहे. अतूट श्रद्धा या मार्गावर महत्वाची आहे. श्रद्धा बाहेरून देता येत नाही. ती आतूनच असावी लागते. मी सुद्धा महावीर बनू शकतो अशी श्रद्धा मनाशी असावी लागते.
