शहर व तालुक्यातील दोन घटनांनी खळबळ : पोलिसांचा तपास वेगात, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर आणि तालुक्यात सलग दोन अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील माऊली हॉस्टेलमधून १६ वर्षीय तरुणी आणि तालुक्यातील तुर्कपिंपरी गावातून १७ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये असून, दोन्ही पोलीस ठाण्यांकडून तपास वेगात सुरू आहे.
माऊली हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास असलेली १६ वर्षीय तरुणी ३१ मे रोजी “गावाला जाते” असे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडली, मात्र ती परतलीच नाही. पालकांना २ जून रोजी याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळविल्याचा संशय व्यक्त करत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याकडून हॉस्टेल कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरु आहे.
तुर्कपिंपरी गावातील १७ वर्षीय मुलगी १ जून रोजी रात्री झोपल्यानंतर सकाळी बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. दरवाजा उघडा दिसल्यामुळे पालकांनी तातडीने शोध सुरू केला. अनेक ठिकाणी चौकशी करूनही ती मिळून आली नाही.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांकडून गावात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
शहर पोलीस आणि तालुका पोलीस दोघेही प्रकरणांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कसून प्रयत्नशील आहेत.
हॉस्टेलमधील विद्यार्थी, मैत्रिणी, गावातील नागरिक यांचे जबाब नोंदवले जात असून, इलेक्ट्रॉनिक व मानवबुद्धीच्या माध्यमातून तपास सुरु आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणालाही यासंदर्भात उपयुक्त माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
या दोन घटनांमुळे शहर आणि तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. “मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांची चिंता वाढली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना व्हाव्यात,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दोन्ही तरुणी सुरक्षित परत याव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त केली जात आहे.
