महाराष्ट्र जैन वार्ता
बार्शी : ३१ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस बार्शीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जिओ और जीने दो” तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या स्मरणार्थ सकल जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने श्री वर्धमान जैन स्थानक येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली. ही सवाद्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री जैन श्वेतांबर ऋषभदेव मंदिर येथे समाप्त झाली.
शोभायात्रेदरम्यान शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते व ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. ज्या भागांत शोभायात्रा पोहोचली नाही, तेथे युवक-युवतींनी “अहिंसा मोटरसायकल रॅली” काढून अहिंसेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. उत्सवात महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला तसेच जैन समाजातील युवक-युवतींचा उत्साह विशेष उल्लेखनीय होता.
या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने एकूण ७८ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात युवकांसह महिला वर्गाचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. हे शिबिर श्री वर्धमान नवयुवक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
भगवान महावीर स्वामींच्या जन्मोत्सव निमित्त स्वर्गीय पन्नालालजी मोहनलालजी श्रीश्रीमाळ यांच्या वतीने समाज बांधवांना महाप्रसादाचे पारंपरिक आयोजन करण्यात आले, ज्याचा मोठ्या संख्येने जैन समाजातील नागरिकांनी लाभ घेतला.
याच महोत्सवानिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी यांच्या वतीने गरजू व गोरगरिबांना १०१ चप्पलांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजातील गरजू घटकांना दिलासा मिळाला.
तसेच जैन समाजाच्या वतीने वर्षभर “जिवदया”, “जैन झुणका भाकर केंद्र”, “श्री महावीर धर्मार्थ दवाखाना” आणि “श्री नवकार जैन सेवातीर्थ” अंतर्गत सुमारे २५० गायींचे संगोपन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी समाजाला आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाऊसाहेब आंधळकर, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, वर्षा ठोंबरे, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ऋषभ जैन श्वेतांबर मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष सुमतीलाल मुनोत, शैलेश वखारिया, श्री वर्धमान जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जयचंद सुराणा, सचिव दिनेश श्रीश्रीमाळ, पदमचंद कांकरिया, अशोक श्रीश्रीमाळ, राहुल कुंकूलोळ, श्री महावीर जैन सेवा संघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, महेश बाफना, श्री वर्धमान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर (बाळासाहेब) श्रीश्रीमाळ, ऑ. सेक्रेटरी आनंद पुनमिया, धीरज कुंकलोळ, पार्श्वनाथ मंदिरचे अध्यक्ष बाहुबली नगरकर, १००८ श्री शांतीनाथ भगवान जैन मंदिरचे अध्यक्ष राजेंद्र येवनकर, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स युवा शाखेचे प्रांतीय मंत्री पवन श्रीश्रीमाळ, धन्यकुमार शहा, जवाहर माडेकर, दिलीप गांधी, राजेंद्र धारूरकर, सुजीत काळे गोरे, राहुल दोशी, यश कुंकूलोळ, कुशल शहा, प्रमोद भंडारी, सुजित गुंदेचा आदींनी विशेष परिश्रम घेतले.



















