जैन समाजातील विवाहप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार : बाळासाहेब धोका
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे ; सध्याच्या बदलत्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीत जैन समाजामध्ये योग्य वयात विवाह न होणे ही गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे मत सकल जैन वधू-वर परिचय मंच, पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी व्यक्त केले. “वधू-वर परिचय ही काळाची गरज” असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पूर्वीपासून जैन समाज व्यवसायात व्यस्त राहिल्यामुळे कुटुंबीय जबाबदाऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मात्र बदलत्या काळानुसार समाज शिक्षणातही आघाडीवर आला आहे. मुलं व्यवसायात तर मुली उच्च शिक्षण व नोकरीत प्रगती करत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
परंतु उच्च शिक्षण, चांगले उत्पन्न, स्वावलंबनाची इच्छा, मर्यादित कुटुंब पद्धती, शहरातच राहण्याची अपेक्षा तसेच विशिष्ट शहरातील जोडीदाराची अट यांसारख्या अनेक कारणांमुळे विवाह जुळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी मुला-मुलींचे वय वाढत चालले असून ही चिंतेची बाब बनली आहे.
या पार्श्वभूमीवर विविध बायोडेटा ग्रुप्सना एकत्र आणून त्यांच्या अनुभवाचा समाजाला लाभ मिळावा यासाठी एक समन्वयित टीम उभी करण्यात आली आहे. या माध्यमातून विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात म्हणून रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी पुण्यात जैन समाजातील अविवाहित युवक-युवतींसाठी भव्य वधू-वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. २० मे २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बाळासाहेब धोका यांनी केले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची परिचय संमेलने आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
संपर्क –
श्री. पृथ्वीराजजी धोका – 9922436401
श्री. झुंबरलालजी गुगळे – 9049166116
श्री. अशोककुमार कटारिया – 9421016298
श्री. सुनील देसर्डा – 9422226078
श्री. पारसमल धोका – 9881111855
सौ. सुरेखा बेटाला – 9422361910
श्री. संपत गादीया – 9860298798
















