12 जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : राज्यात वेगवेगळे महामार्ग तयार केले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना हा मार्ग कनेक्ट करत आहे.
या मार्गाची एकूण लांबी 701 किमी एवढी असून आत्तापर्यंत जवळपास 600 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम देखील जलद गतीने सुरू आहे.
याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नवीन शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. हा शक्ती पीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान विकसित होणार आहे.
हा ८०२ किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार असून याच्या फायनल अलाइनमेंटला अर्थातच अंतिम आखणीला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात या महामार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना परस्परांना कनेक्ट करणार आहे.
शिवाय इतरही अन्य महत्त्वाची देवस्थाने या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. परिणामी देवदर्शन सोपे होणार आहे. एम एस आर डी सी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
हा 802 किलोमीटर लांबीचा मार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील 19 देवस्थानांना जोडणार आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास तर सोयीचा होणारच आहे.
शिवाय धार्मिक, कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे उभारी मिळण्याची आशा आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे.
हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर आणि सेवाग्राम येथून जाणार आहे. वाशिम येथील पोहरादेवी आणि नांदेड येथील माहूरगड शक्तीपीठ, सचखंड गुरुद्वारा येथून जाणार आहे.
हिंगोली येथील औंढा नागनाथ, बीड येथील परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई शक्तीपीठ, धाराशिव येथील तुळजापूर भवानी मातेचे मंदिर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना हा मार्ग कनेक्ट करणार आहे.
शिवाय सांगली जिल्ह्यातील औदुंबरचे दत्त मंदिर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर, संत बाळूमामा समाधीस्थळ आदमापूर हे तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत.
एवढेच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी हे तीर्थक्षेत्र देखील हा महामार्ग जोडणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
