गोयल गार्डन येथे महावीर गाथा प्रवचनमाला सुरु
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : अहंकार हा विनाशाचा मार्ग आहे. आपल्याला जीवनात यश मिळाले तर त्या यशाचे श्रेय गुरु ईश्वर आणि आई-वडील यांना द्यायला शिका आणि जर अपयश आले तर त्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला शिका. जी माणसं अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही ती त्यांच्या प्रगतीचे मार्ग स्वतःच बंद करून टाकतात असे प्रतिपादन उपाध्याय प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी व्यक्त केले.
भगवान महावीरांचे विचार हे आदर्श देशनिर्मितीसाठी कसे महत्वाचे आहेत हे समजून सांगण्यासाठी हजारो की.मी.चा पायी प्रवास करून घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. हे पुण्यात आलेले आहेत.
गंगाधाम – शत्रुंजय रोडवरील गोयल गार्डन येथे ‘महावीर गाथा’ या प्रवचनमालिकेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले.
यावेळी त्यांच्या समवेत प. पु. तिर्थेशऋषिजी म. सा., प. पु. अचलऋषींजी म. सा. उपस्थित होते. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 10 हजारहून अधिक भाविक या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनात नैसर या एका अहंकाराने ग्रासलेल्या आणि नंतर गुरुचे महत्व जाणलेल्या शिष्याची कथा सांगितली. गुरु शिष्याचे नाते कसे असते आणि गुरु कसा घडवतो त्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्यापेक्षा मोठा होऊ पाडणाऱ्या एकलव्याचा अंगठा मागणारे द्रोणाचार्य आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत.
दुसऱ्याचे वाईट घडावे म्हणून आपण आपली किती शक्ती खर्च करतो ते प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून पाहायला हवे. प्रत्येक आई-वडिलांना जसे आपले मूल चांगले व्हावे असे वाटत असते त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूला आपला शिष्य उत्तम व्हावा अशी इच्छा असते. आपल्याला घडवणारा, बनवणारा गुरुच असतो.
आपली दृष्टी कायम गुरूकडे असावी ही सामान्य बाब आहे परंतु गुरूंची कृपादृष्टी सातत्याने आपल्याकडे असणे ही गुरुकृपा असते. गुरुच आपल्याला घडवतात आणि आपल्याकडून अनेक गोष्टी करून घेतात हे ज्यांना लक्षात येत नाही ती माणसे अहंकाराने ग्रासली जातात.
अहंकाराने भरलेला माणूस स्वतःच्या विनाशाचे मार्ग आखू लागतो. म्हणूनच गुरुप्रती अपरंपार श्रद्धा आणि पराकोटीची विनयशीलता आपल्यात असणे आवश्यक आहे. केवळ एकट्याने कामे करण्यापेक्षा सहयोगानेच कामे मोठी होऊ शकतात हे लक्षात ठेवा.
