IPS मनोज पाटील : जितो “सुहाना कॉफी टेबल मीटचे” आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या दोन्ही प्रक्रिया संलग्न असाव्यात, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) IPS मनोज पाटील यांनी दिली.
सुहाना कॉफी टेबल मीट विथ IPS मनोज पाटील सर या कार्यक्रमाचे आयोजन 12 डिसेंबर 2024 रोजी जीतो पुणे ऑफीस येथे जीतो कॉफी टेबल कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. कॉफी टेबल कमीटीचे किशोर ओसवाल, प्रसन्न मेहता यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. कॉफी टेबल मिटचे संचालक अभिजीत डुंगरवाल यांनी उपक्रमाची माहिती देत सूत्रसंचालन केले.
यावेळी जितो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, JATF चे राष्ट्रीय अध्यक्ष इंदर जैन, ROM JATF चे अध्यक्ष रवींद्र सांकला, जितो Apex डायरेक्टर राजेश सांकला, अचल जैन, जितोचे पुणेचे उपाध्यक्ष अजय मेहता, चेतन भंडारी, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, नरेंद्र छाजेड, प्रवीण चोरबेले, संतोष जैन, आनंद चोरडिया, संजय जैन, मुकेश छाजेड, अनिल भन्साळी, आनंद मेहता, राजेंद्र ललवाणी, राजेंद्र भाठीया, दिलीप बिनाकिया, राहुल संचेती, डॉ. सुमतीलाल लोढा, कल्पेश जैन, करण जैन, संजय राठोड, महेंद्र सुंदेचा मुथा, लेडीज विंग अध्यक्षा पूनम ओसवाल, अॅपेक्स डायरेक्टर प्रियंका परमार, चीफ सेक्रेटरी अचला भंडारी, लकीशा मर्लेचा, एकता भन्साळी, दक्षा जैन आदी उपस्थित होते.
व्यावसायिक तक्रारींचे निवारण कसे करावे, गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपययोजना कशा असाव्यात, कायद्याची अंमलबजाणी काटेकोरपणे होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य कसे अपेक्षित आहे, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेची प्रणाली विकसित करताना धोरणे काय असावीत, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने जगजागृती मोहीम राबविण्याबाबत तसेच वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेचा अवलंब करताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा केला जाईल या विषयीची माहिती मनोज पाटील यांनी सविस्तरपणे दिली.
पाटील म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसह नव्या युगाच्या तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. पुण्याभोवती रिंगरोड नसल्याने शहारातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची वारंवार कोंडी होताना दिसते. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच पदपथांवरील अतिक्रमणे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सायबर क्राईमबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. अशी काही घटना घडल्यास 1930 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधून माहिती दिल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जितोची सहकार्याची भूमिका..
वाहतुकीचे नियमन, जनजागृती करण्यासाठी जितोच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल अशी ग्वाही या प्रसंगी जितो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड यांनी दिली. काही व्यावसायिकांना गुंडगिरीचा सामना करावा लागतो, अशा तक्रारीही या प्रसंगी करण्यात आल्या. – इंद्रकुमार छाजेड, अध्यक्ष जितो पुणे
