सात दिवसांत ४१६ अतिक्रमणे निष्कासित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या सात दिवसांत ४१६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना निर्देश दिले होते. त्यानुसार, गेल्या सात दिवसांपासून पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी येथे धडक कारवाई सुरू आहे.
२९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी, १७ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडीतील लक्ष्मी चौकात आणि २३ डिसेंबर २०२४ रोजी नवले ब्रीज येथे मोठी कारवाई करण्यात आली होती.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, नोटीस मिळूनही जर अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले, तर संबंधित अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी तथा सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेचे नेतृत्व पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांनी केले. तसेच, सहआयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंते अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव आणि इतर अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
आगामी काही दिवसांत पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, मुळशी-पौड आणि चांदणी चौक ते पिरंगुट या मार्गांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे निष्कासित केली जाणार आहेत. त्यानुसार, लवकरच सर्वेक्षणासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
