एनआयव्हीचा अहवाल : शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. खडकवासला धरणालगत असलेल्या गावांना शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जात असल्याने या गावांमध्ये प्रामुख्याने जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, जीबीएसची लागण दूषित पाण्यामुळेच होत असल्याचे एनआयव्हीच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. जलवाहिन्यांद्वारे नागरिकांना पाणी पोहोचताना त्यामध्ये क्लोरीनची मात्रा ०.३ पीपीएम असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या पाण्यात ०.६ ते ०.७ पीपीएम क्लोरीन असल्याचे तपासणीत आढळून आले.
नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर, डी. एस. के. विश्व या भागांना धरणाचे पाणी प्रक्रिया न करता पुरवले जाते. त्यामुळे या भागांसाठी एक दशलक्ष लिटर क्षमतेचा छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे.
धायरी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, सणसवाडी, नर्हे या परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने जुलाब, उलट्या आणि इतर पाणीजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. जीबीएस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणवठ्यांची तपासणी करण्यात आली.
खासगी टँकरद्वारे पुरवठा होणाऱ्या विहिरींमध्ये ई. कोलाई हा जीवाणू आढळला. त्यामुळे संबंधित विहीर मालकांना नोटिसा बजावून पाणी शुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “शुद्ध पाणी” या नावाखाली आरओ प्रकल्प चालक पाणी विकत आहेत.
मात्र, त्यांच्या पाण्यात जीबीएससाठी जबाबदार असणारा ई. कोलाई जीवाणू आढळला आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील जवळपास २७ आरओ प्रकल्पांना महापालिकेने सील केले आहे. खडकवासला धरण परिसरातील गावांना प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केल्याने या गावांमध्ये जीबीएसची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
पानशेत ते खडकवासला दरम्यान मोठ्या प्रमाणावर सोसायट्या आणि फार्महाऊसेस उभारली गेली आहेत. या ठिकाणचे सांडपाणी थेट नाल्यांत सोडले जाते, ते नाल्यांद्वारे खडकवासला धरणात मिसळत आहे. यामुळे धरणातील पाणी अशुद्ध होत असून, खडकवासला धरणात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
