धायरी गावातील घटना : नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती वादाच्या दरम्यान चुलत भावाने दिलेल्या धक्क्याने तरुण बाल्कनीतून खाली पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना धायरी गावात घडली. मात्र, आरोपीने जखमी भावाला मदत करण्याऐवजी शांत बसणे पसंत केले. तसेच, हा प्रकार पाहणाऱ्या इतर दोघांनीही कोणालाही काहीही न सांगता तेथून निघून जाणेच योग्य समजले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी चुलत भावाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजू भुरेलाल देशमुख (रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे आहे, तर मृत तरुणाचे नाव अमर किसन देशमुख (वय ३५, रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे आहे.
या प्रकरणी मोहपत हरीराम साहारे (वय ३६, रा. धायरीगाव) यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ :४५ च्या सुमारास घडली. राजू आणि अमर हे चुलत भाऊ असून, दोघेही मुळचे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.
ते पुण्यात सोनपापडीच्या कारखान्यात काम करतात आणि कपील अपार्टमेंटमध्ये इतर दोघांसोबत राहत होते. घटनास्थळी चौघे एकत्र असताना गावाकडील त्यांच्या पत्नींबाबत बोलताना राजू आणि अमर यांच्यात वाद झाला.
भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि अमरने राजूच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजूने अमरला जोरात ढकलले, त्यामुळे अमर तोल जाऊन सरळ बाल्कनीतून खाली पडला.
अमर गंभीर जखमी अवस्थेत खाली पडला, पण राजू देशमुखने कोणतीही मदत केली नाही आणि घरात शांत बसून राहिला. त्याचवेळी, हा संपूर्ण प्रकार पाहणाऱ्या इतर दोघांनीही पोलिसांना किंवा कुणालाही काहीही सांगितले नाही आणि घटनास्थळावरून निघून गेले.
रात्री उशिराचा वेळ असल्याने अमर खाली पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना समोर आली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशी केल्यानंतर राजू देशमुखने सत्य कबूल केले.
अमरच्या मृत्यूस जबाबदार असल्याने राजू देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे करत आहेत.
