राज्यातील तृतीयपंथी समुदायाने सामाजिक न्याय मंत्र्यांकडे निवेदन सादर केले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : राज्यातील तृतीयपंथी समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुन्हा सक्रिय करण्यात यावे, अशी मागणी राज्यातील तृतीयपंथी समुदायाने केली आहे. या संदर्भात पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवानी (अध्यक्ष, सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड), मयुरी आळवेकर (अध्यक्ष, मैत्री फाउंडेशन, कोल्हापूर) आणि बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन वायकुळे यावेळी उपस्थित होते.
तृतीयपंथी समुदायाच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, समाजकल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले होते.
मात्र, काही कारणांमुळे मंडळाच्या कार्यात अडथळे आले आणि ते काही काळासाठी खंडित झाले. त्यामुळे हे मंडळ पुनर्स्थापित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर मंत्रीमंडळात चर्चा करण्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
भविष्यात या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल. हे मंडळ पुनर्स्थापित झाल्यास तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असेही मिसाळ यांनी सांगितले.
