पोलीस आयुक्त अमितेश कुमार : गजा मारणे टोळीच्या मालमत्तेची चौकशी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरूडमध्ये आयटी इंजिनिअर तरुणाला झालेली मारहाण ही साधी घटना नसून, त्याकडे संघटित गुन्हेगारीचे कृत्य म्हणून पोलीस पाहत आहेत. गजा मारणेच्या टोळीतील २७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. गजा मारणेसह सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, ही टोळी उद्ध्वस्त करणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वातार्लाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कोथरुड येथील भेलकेनगर चौकात चौघांनी देवेंद्र जोग यांना मारहाण केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर यांना अटक केली आहे. गजा मारणे याचा भाचा बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हा फरार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही केवळ मारामारी म्हणून पोलीस त्याकडे पहात नाही.
संघटित गुन्हेगारी टोळीचे हे कृत्य म्हणून पोलीस त्याकडे पहात आहे. त्यादृष्टीने टोळी उद्धस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. कोणीही मुख्य प्रवाहात येणार असेल, तर त्याच्याशी दुश्मनी करण्याचे पोलिसांना काही कारण नाही.
परंतु, ते येथील कायद्याला हात घालत असतील, कायद्याशी खेळत असतील तर त्यांची गय करणार नाही. कोणाचाही दबाव पोलीस सहन करणार नाही. कोथरुडमधील घटना घडण्यापूर्वी चित्रपट पाहण्यासाठी किती जण गेले होते, त्यापासून त्यांच्यात काय संभाषण झाले, या सर्वांचे सीडीआर पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून काढले आहेत.
गजा मारणे सह त्याच्या टोळीतील २७ जण फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गेल्या तीन दिवसात पुणे व मुळशी येथील ७४ ठिकाणी पोलिसांनी छापे घातले आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
या टोळीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका, मुद्रांक महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे. टोळीच्या नावावर किती वाहने आहेत, याची माहिती आर टीओकडे मागितली आहे.
या सर्व बाजूने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. या टोळीने कोणाला त्रास दिला असेल, अथवा टोळीविषयी काही माहिती असेल तर गुन्हे शाखेची संपर्क साधावा. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
फसवणुक करणार्या बिल्डरांवर कारवाई – पैसे घेऊनही वेळेवर ताबा न देणाऱ्या, लोकांची फसवणूक करणार्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीवर अतिक्रमण करुन ती हडपण्याचा प्रयत्न करण्याविषयी तक्रार आल्यावर पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस त्यात निवाडा करणार नाही तर कागदपत्रांची तपासणी करुन कोणावर अन्याय होणार नाही, कोणी जबरदस्तीने ताबा घेतला आहे का याची तपासणी करतील. महारेराच्या टाईम लाईन नुसार फ्लॅटचा ताबा देण्याबाबतचे उल्लंघन केल असेल तर त्यांच्यावर एमपीआयडीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून होणार्या फसवणुकीबाबत नुकतीच क्रीडाईसोबत बैठक घेण्यात आली असून त्यातून काय मार्ग काढता येईल, हे पाहिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसांपुढे आका, काका चालत नाही – माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या अपहरणावरुन विचारलेल्या प्रश्नाबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, अपहरण, मिसिंग याकडे संवेदनशीलपणे पहाण्यास सांगण्यात आले आहे. सावंत प्रकरणात पोलिसांकडे जेव्हा अपहरणाची तक्रार आली तेव्हा, पोलीस तातडीने सतर्क झाले. तो अपहरणाचा प्रकार नव्हता, हे नंतर पुढे आले. पण, विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले असते तर ते पुन्हा परत मागे आणणे अवघड गेले होते. मुलींच्या मिसिंगबाबत अनेकदा आपण स्वत: रस्त्यावर उतरुन शोध घेतला आहे. पोलिसांना कोणी वापरुन घेऊ शकणार नाही. पोलीस ठाण्यात कोणी आका, काका नाही. गुन्हा केला असेल तर त्याला कोणी वाचवू शकणार नाही.
