महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गेली चार वर्षे नियमितपणे शुद्ध सोने घेऊन दागिने बनवून आणणाऱ्या कारागिराने तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांचे १७० ग्रॅम शुद्ध सोने घेऊन पलायन केले.
याबाबत सुकुमार विष्णुपादा भुक्ता (वय ४०, रा. नवकार रेसिडेन्सी, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सशांक मदन पाल (रा. लक्ष्मी कॉर्नर, रास्ता पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादी यांच्या ‘सुकुमार गोल्ड स्मिथ’ या रविवार पेठेतील सोने कारागिरीच्या दुकानात १४ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविवार पेठेत ‘सुकुमार गोल्ड स्मिथ’ हे सोने कारागिरीचे दुकान २०१९ पासून सुरू आहे. दुकानात ते स्वतःचे सोने वापरून ऑर्डरप्रमाणे दागिने तयार करतात. दुकानात १० कारागीर असून त्यांना ते मजुरी देतात. मोठ्या प्रमाणात दागिने तयार करण्याच्या ऑर्डर आल्यास, ते बाहेरील ओळखीच्या कारागिरांकडे काम देतात.
लॉकडाऊननंतर गावाकडील सोने कारागीर सशांक पाल याला कोणीही काम देत नसल्याने, त्याच्या विनंतीवरून फिर्यादी त्याला सोने देऊन दागिने तयार करून घेऊ लागले. सशांक पाल याचे रविवार पेठेतील ‘नंदन हाइट्स’ येथे दागिने तयार करण्याचे दुकान होते. दैनंदिन व्यवहारांमुळे दोघांमध्ये विश्वास निर्माण झाला होता.
१४ डिसेंबर रोजी सशांक पाल याला २०८ ग्रॅम शुद्ध सोने देऊन दागिने तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. २९ डिसेंबर रोजी त्याने ४० ग्रॅम वजनाचे सोने वापरून तयार केलेले दागिने दुकानात जमा केले. मात्र, त्याची कारागिरी वजा करून उर्वरित १७० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने त्याच्याकडे बाकी होते. त्याने नवीन ऑर्डर घेऊन दुकानातून निघून गेला.
३० डिसेंबर रोजी तो दागिने तयार करून आणण्यासाठी न आल्याने, फिर्यादी यांनी त्याला फोन केला असता, त्याचा मोबाईल बंद होता. त्यांच्या दुकानात जाऊन पाहिले असता, दुकान बंद होते. घरी जाऊन शोध घेतल्यावर तिथेही कुलूप होते. त्याच्या पत्नी आणि मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोनही बंद होते.
यामुळे सशांक पाल सोने घेऊन पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी काही दिवस वाट पाहिली, मात्र तो परत न आल्याने त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.
