बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : माढा तालुक्यातील मौजे अकोले (बु.) येथे घडलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी बार्शी येथील सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आगतराव काळे यांचा मुलगा अपघातात मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नी कोमल ला तिच्या आई लक्ष्मी पवार हिला भेटू दिले जात नव्हते. 30 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मी हीस तिच्या मुलीची भेट घालून देते, असे सांगून कीर्तीमाला आणि प्रीती उर्फ गुड्डी यांनी तिला बोलावले.
त्यानंतर 5000 रुपये घेतले व तिच्या भावावर करणी केल्याचा आरोप करत कीर्तीमाला, प्रीती, प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय भालेकर, आगतराव काळे आणि विमल काळे यांनी एकत्र कट रचला.
या सर्व आरोपींनी कोयता, सुरा आणि लोखंडी कुऱ्हाड यांसारख्या घातक शस्त्रांनी क्रूर हल्ला करून लक्ष्मीची निर्घृण हत्या केली.
तिच्या नरडीवर सूऱ्याने वार करून, हात-पाय कापून गंभीर जखमी करत अखेर प्रेताला साडीसह दगड बांधून विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मयत लक्ष्मीची बहीण यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गुन्हा क्रमांक 50/2021 अन्वये तपास हाती घेण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास करून सबळ पुरावे गोळा केले व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी करण भोसले, पो.कॉ. तुकाराम माने देशमुख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच, तपासी अंमलदार DySP राजकुमार केंद्रे यांनी गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि मृतदेह सापडल्याच्या घटनाक्रमाच्या आधारे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी न्यायालयासमोर ठोस मांडणी केली.
बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी आरोपी 1.कीर्तीमाला काळे (वय 25 वर्षे), 2. आगतराव काळे (वय 73 वर्षे), 3. रॉकी उर्फ अक्षय भालेकर (वय 25 वर्षे) यांना भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 3000/- रुपये दंड, कलम 120(ब) अन्वये 14 वर्षे कठोर शिक्षा व प्रत्येकी 2000/- रुपये दंड,
कलम 201 अन्वये 3 वर्षे शिक्षा व प्रत्येकी 1000/- रुपये दंड ठोठावण्यात आला. तर आरोपी क्रमांक 4 यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास DySP राजकुमार केंद्रे, तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर यांनी केला.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद केला, तर कोर्ट पैरवीसाठी पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी सहकार्य केले. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील आणि टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपक पाटील यांनी फिर्यादी व साक्षीदारांना मार्गदर्शन केले.
या निर्णयामुळे महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी होईल आणि समाजात न्यायप्राप्तीचा विश्वास दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
