मुद्रांक शुल्क लागणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यासह कोट्यवधी नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरीता अनेक प्रमाणपत्रे लागत असतात.
त्यामुळे परिक्षा संपल्या की जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पूर्वी यासाठी १०० रुपयांचे स्टॉम्प पेपर लागत असे. परंतु, गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी सरकारने १०० रुपयांऐवजी ५०० रुपयांचे स्टॉम्प पेपर बंधनकारक केला आहे.
त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठीचा खर्च चार पट वाढला होता. प्रत्येक दाखल्यासाठी ५०० रुपये प्रमाणे जवळपास ३ हजार रुपये शालेय प्रवेशासाठी खर्च येऊ लागला होता. शासनाने हा निर्णय घेतल्याने आता हा खर्च वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज करुन सेतू कार्यालयामार्फत नागरिकांना शैक्षणिक कारणासाठी लागणारे सर्व प्रतिज्ञापत्रांवर मुद्रांक शुल्क लागणार नाही.
