आरटीई प्रवेशासाठी केली शासनाची दिशाभूल : गटशिक्षणाधिकार्यांची तक्रार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आरटीई प्रवेशासाठी (शिक्षणाचा हक्क) खोटा रहिवासी पुरावा सादर करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील १८ पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला गटशिक्षणाधिकारी यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत खासगी शाळांमध्ये काही जागा गरीब मुलांसाठी राखून ठेवल्या जातात.
त्यांच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत शाळांना दिला जातो. शाळेच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील पाल्यांसाठी ही योजना आहे. असे असताना अनेक पालकांनी खोटी कागदपत्रे सादर करुन आपल्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान भुगाव येथील माताळवाडी या ठिकाणी संबंधित पालकांनी खोटी कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आले आहे.
सचिन चंद्रकांत भोसले, खंडू दिलीप बिरादार, रामकृष्ण तानाजी चोंधे, सुमित सुरेश इंगवले, विजय सुभाष जोजारे, मंगेश गुलाब काळभोर, रोहिदास मारुती कोंढाळकर, श्रीधर बाबुराव नागुरे, बाबासाहेब छबुराव रंधे, विलास रामदास साळुंखे, गणेश राजाराम सांगळे, रुपेश बाळकृष्ण सावंत, दिगंबर पंडित सावंत, चंदन अंकुश शेलार, कुंभराम सांगीलाल सुतार, मंगेश झबुलाल गुरव, विवेक जयवंत जोरी, उमेश हिरामण शेवडे अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.
शिक्षण विभागाने वेळोवेळी परिपत्रक प्रसिद्ध करून बनावट कागदपत्र सादर करणार्या पालकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे खोटा रहिवासी पुरावा सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवल्यास संबंधित पालकांविरोधात कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
पालकांनी सादर केलेल्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षण विभागातील अधिकारी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले होते. शिक्षण विभागाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने दिलेल्या अहवालानंतर खोटी कागदपत्रे सादर करुन प्रवेश मिळाल्याचे समोर आले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अन्य भागामधील शाळांमध्येही खोटी कागदपत्रे दाखल करुन आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
