सुपारी देणाऱ्या प्रियकरासह यवत पोलिसांनी पाच जणांना केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणीने होणारा पती पसंत नसल्याने त्याला जीवे ठार मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण झालेल्या नवरदेवाच्या घरी दु:खद घटना घडल्याने हे होणारे लग्न रद्द झाले. त्यानंतर आता या वधूनेच प्रेमसंबंधांमुळे होणाऱ्या पतीला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून ही तरुणी फरार आहे.
आदित्य शंकर दांगडे (वय १९, रा. गुघलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), संदीप दादा गावडे (वय ४०, रा. गुघलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), शिवाजी रामदास जरे (वय ३२, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), सुरज दिगंबर जाधव (वय ३६, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मयुरी सुनील दांगडे (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) ही फरार आहे.
याबाबत सागर जयसिंग कदम (वय २८, रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारहाणीची घटना दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील खामगाव फाट्याजवळील साई मिसळ हॉटेलजवळ २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कदम हे बाणेर येथील एका हॉटेलमध्ये कुक आहेत. त्यांचा मयुरी दांगडे हिच्याशी विवाह ठरला होता. प्री-वेडिंग शूटिंगही झाले होते, तसेच १२ मार्च रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली होती.
२२ फेब्रुवारी रोजी सागर कदम यांना अज्ञात नंबरवरून फोन आला. “तू मयुरीशी लग्न करू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील. आम्ही पळून जाऊन लग्न करणार,” असे धमकीत सांगण्यात आले. सागर यांनी ही बाब मयुरी व तिच्या भावांशी बोलून स्पष्ट केली. त्यावेळी मयुरीने “माझे तसे काही नाही, तुम्ही चौकशी करू शकता,” असे सांगितले.
२७ फेब्रुवारी रोजी मयुरीने सागरला चित्रपट पाहण्यासाठी बोलावले. त्यांनी हडपसरमध्ये चित्रपट पाहिला व नंतर सागरने तिला तिच्या नातेवाईकांकडे सोडले. परंतु परत येत असताना, खामगाव फाटा येथे चारचाकी गाडीतून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडवले व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
सागरने प्रतिकार करत विचारले, “मला का मारता?” त्यावर त्यांना धमकी देण्यात आली की, “जर मयुरीशी लग्न केले तर तुला दाखवतो. याचा पाय मोडला पाहिजे, याला लग्नात उभे राहता येता कामा नये,” असे म्हणून त्यांच्या डोक्यावर, पायावर, पाठीवर आणि हातावर अमानुष मारहाण करण्यात आली.
सागर यांनी उपचार घेतल्यानंतर १ मार्च रोजी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी मारहाण करणाऱ्या गाडीचा नंबर पोलिसांना दिला, त्यानंतर पोलिसांनी तपास करून आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली मिळाली.
सागर कदम यांनी पोलिसांना सांगितले की, “माझ्या मारहाणीत मयुरीचाही हात असल्याचा संशय होता. आमच्या घरात दु:खद घटना घडल्याने लग्न रद्द झाले. परंतु आरोपींपैकी एकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच तिने हा प्रकार घडवून आणला.”
यवत पोलिसांनी केलेल्या तपासात मयुरी दांगडे व संदीप गावडे यांनी सागर कदम यांना जीवे मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी आदित्य दांगडे व इतरांना दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचे कलम वाढविण्यात आले आहे.
खामगाव फाटा येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर काही जणांनी सागर कदम यांना श्रीसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विशेष म्हणजे, घटनानंतर मयुरी दांगडे आणि तिचे खामगाव येथील नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सलीम शेख, मारोती मेतलवाड आणि त्यांच्या पथकाने केला.
या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वधूनेच होणाऱ्या पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचा प्रकार धक्कादायक ठरला आहे.
