आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महसूल क्षेत्रात क्रांतिकारक बदलांची सुरुवात १५ ऑगस्टपासून – मुख्यमंत्री फडणवीस

Spread the love

पुणे : राज्य सरकार महसूल विभागातील कार्यपद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुखता यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत असून त्याची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून केली जाणार आहे. पुण्यातील महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येणार असून, त्यांचे अहवाल ३० जूनपर्यंत मागवले गेले आहेत. या शिफारशींचा विचार करून त्यांची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने ‘शंभर दिवस कृती कार्यक्रम’ राबविला असून त्याअंतर्गत विविध सुधारणा आणि आधुनिक उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहन केले. शासनाच्या दृष्टीने भूसंपादन हा महत्वाचा विषय असून, त्यासाठी सुस्पष्ट व पारदर्शक प्रक्रिया आवश्यक आहे.

यामध्ये ड्रोन, उपग्रह चित्रणाचा वापर करावा. प्रत्येक महिन्याला प्रकरणांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घ्यावा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाचा पाठीचा कणा असल्याचे सांगून, कामाचा ताण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे सुचवले.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले की, विभागाच्या नियमावलीत सुधारणा करण्यात येणार असून पीक पाहणी उपग्रहाद्वारे होणार आहे. या कार्यशाळेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले. महसूल अधिकारी नियमपुस्तिकेचे प्रकाशन तसेच संगणक प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले.

राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे महसूल विभाग अधिक पारदर्शक, कार्यक्षम व नागरिकाभिमुख होणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक परिवर्तनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.