बदनामीचा खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी, सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होणार असल्याचा निर्णय येथील एमपी-एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला आहे.
लंडनमध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले होते की, सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवले आहे की, “आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा काही लोक एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करीत होते. ते बघून खूप आनंद वाटत होता.”
परंतु, सावरकरांनी असे कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नाही, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे. म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, असा आरोप आहे.
या बदनामीच्या खटल्याची सुनावणी आज न्यायालयात पार पडली.
राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्यावतीने या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
हा खटला काही ऐतिहासिक प्रसंगांवर व घटनांवर अवलंबून आहे.
विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीत किती आणि कसे योगदान होते, त्यांनी किती पुस्तके लिहिली आहेत, त्यांचे मुस्लिमांबद्दलचे विचार काय होते, तसेच ब्रिटिशांशी त्यांचे संबंध कसे होते — अशा अनेक ऐतिहासिक संदर्भांवर या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे.
नैसर्गिक न्यायतत्त्वांना धरून व कायद्यातील तरतुदींनुसार, बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी व उलट तपासणी विस्तृतपणे घेण्याचा अधिकार आहे. परंतु या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास, बचाव पक्षाला साक्षीदारांचा विस्तृत आणि सखोल उलट तपास घेता येणार नाही.
‘समन्स ट्रायल’ म्हणून खटल्याची सुनावणी घेतल्यास, बचाव पक्षाला या खटल्यात विस्तृत व सखोलपणे बाजू मांडण्याची, वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची व प्रसंगी सरकारकडून ती मागविण्याची परवानगी मिळू शकते.
म्हणून या फौजदारी खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून व्हावी, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी केला होता. वरील अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राहुल गांधी यांचा अर्ज व विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी मान्य केली आहे.
त्यामुळे आता इथून पुढे या खटल्याची नियमित सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होणार आहे. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्रे, राहुल गांधी यांनी लंडनमधील डायस्पोरा या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्रे, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रे — ही सर्व कागदपत्रे आजपर्यंत बचाव पक्षाला हस्तांतरित केलेली नाहीत.
सुनावणी सुरू होण्यापूर्वी ती कागदपत्रे बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने फिर्यादींना द्यावेत, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी केला आहे. त्यावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे न्यायालयाने मागविले आहे. खटल्याची पुढील सुनावणी २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
