श्री नवकार जैन सेवा तीर्थ गोरक्षण संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस” रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बार्शी येथील एस.टी. बस स्थानकावर सकाळी १०:३० वाजता श्री नवकार जैन सेवा तीर्थ, बार्शी (अलिपूर) संचालित गोसेवा संस्थेमार्फत विशेष विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले.
या स्टॉलमध्ये गोमयापासून तयार करण्यात आलेली जैविक व पर्यावरणपूरक उत्पादने जसे की जैविक खत (सेंद्रिय गोशेणखत), गोकाष्ट (गोमय निर्मित इंधन), पारंपरिक गोर्या आदींचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. यासोबतच गोरक्षणा कडून १०० ते १५० किलोपर्यंत गोकाष्ट व गौऱ्या यांचे मोफत वाटप करण्यात आले, ज्याला नागरिकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाचा उद्देश गोशाळांना स्वावलंबी बनविणे, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर वाढवणे तसेच जनतेमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ७ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक काढून राज्यभर विक्री दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, श्री नवकार जैन सेवा तीर्थ संस्थेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारात स्टॉल उभारण्याची अधिकृत परवानगी घेतली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी पशुधन विकास अधिकारी श्री राहुल गोसावी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरजकुमार गुळमिरे, जनमाहिती अधिकारी तथा आगार व्यवस्थापक म. सं. जाधवर, आणि सहाय्यक आयुक्त (आधीक्षक) बार्शी आगार विजयकुमार हांडे व बार्शी आगाराचे वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणांमधून गोमय मूल्यवर्धित उत्पादनांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला.
या उपक्रमास स्थानिक जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन, गोपालनाचा सामाजिक भाग, आणि स्वावलंबी गोशाळांचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार या कार्यक्रमात मांडले गेले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार शहा, संचालक गोविंद बाफना, पवन श्रीश्रीमाळ, निरव छेडा, प्राणी मित्र धन्यकुमार पटवा, गोरक्षण सेवक बाळासाहेब ओहाळ यांचा विशेष सहभाग होता.
यावेळी गोशाळेचे अध्यक्ष धन्यकुमार शहा यांनी शासनाचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे जनतेमध्ये पर्यावरणजाणीव आणि नैतिक जबाबदारी निर्माण होते.यामुळे होणारा नागरिकांमधील सकारात्मक बदल खूप प्रेरणादायी असेल, असे त्यांनी ठामपणे पटवून दिले. शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.
