कालिदास महोत्सवात दोन नवोदित कवींना होणार गौरव : १० जून २०२५ ही शेवटची तारीख
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या कालिदास महोत्सवाच्या निमित्ताने नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला ‘मेघदूत’ पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवावेत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले आहे.
गेल्या ३२ वर्षांपासून कवी कालिदास मंडळ साहित्य क्षेत्रात सक्रीय आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मंडळ दरवर्षी ‘मेघदूत’ पुरस्काराचे आयोजन करते. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पहिल्या काव्यसंग्रहांपैकी दोन उत्कृष्ट संग्रहांची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. ‘मेघदूत’ पुरस्कार साहित्यिक पं. ना. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कवी मुकुंदराज कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने प्रदान केला जातो.
सर्व इच्छुक नवोदित कवींनी आपला काव्यसंग्रह (तीन प्रती), स्वतःचे छायाचित्र आणि अल्पपरिचय १० जून २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत: प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर, पिन ४१३४११ संपर्क: ९७६३४६६८३०
या कार्यक्रमाच्या वेळी दत्ता गोसावी, प्रा. अशोक वाघमारे, सुमन चंद्रशेखर, डॉ. कृष्णा मस्तुद, जयसिंग राजपूत, चन्नबसवेश्वर ढवण, आबासाहेब घावटे, डॉ. रविराज फुरडे, शिवानंद चंद्रशेखर, गंगाधर अहिरे आदी उपस्थित होते.
