आ. राहुल मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः परांडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर परांडा, भुम व वाशी तालुक्यांतील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी परांडा मतदारसंघाचे आमदार मा. राहुल भैय्या मोटे यांनी जिल्हाधिकारी श्री. कीर्तीकिरण पुजार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा, कांद्याचे पीक, फळबागा तसेच इतर शेतीमालांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांवर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त भागांमध्ये प्रशासनाने तत्काळ पंचनामे सुरू करावेत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाला कारवाईचे निर्देश देण्याची मागणी
या त्रासदायक परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिन्ही तालुक्यांमध्ये – परांडा, भुम आणि वाशी – येथे सरसकट पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश द्यावेत, अशी विनंतीही आ. राहुल मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
