रिक्षाचालकाला अटक, सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उसने दिलेले पैसे परत करत नसल्याच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. याप्रकरणी एका रिक्षाचालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे.
श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. सूर्यउज्वल हाईट्स, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अंमलदार नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पंडित हा रिक्षाचालक आहे. श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते. तो तिला दररोज बुधवार पेठेत रिक्षातून सोडायचा. त्यातून त्यांच्यात ओळख झाली होती.
काही महिन्यांपूर्वी श्यामली सरकार हिने आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगितले होते. तेव्हा नितीन पंडित याने ५० हजार रुपये हात उसने दिले होते. पंडितने तिला पैसे परत मागितले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वाद झाले.
बुधवारी (४ जून) दुपारी चारच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. सरकारच्या फ्लॅटवर तो गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला.
यानंतर पंडित हा गुरुवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सरकारचा खून केल्याची कबुली दिली. पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे यांनी दिली.
