पाच तासांत दोघा आरोपींचा छडा, मुली सुखरूप सापडल्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : शहरात गाजत असलेल्या अपहरण प्रकरणात बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अपहृत दोन अल्पवयीन मुलींना सुखरूप शोधून काढत दोन संशयितांना ताब्यात घेऊन उल्लेखनीय यश मिळवलं आहे. या जलद आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांकडून बार्शी पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९३/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम १३७/२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनम डी. जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
दिनांक ३ जून २०२५ रोजी लक्ष्मीबाई हॉस्टेल, शिवाजी कॉलेजमागे, बार्शी येथून (वय १६ वर्षे १० महिने) व (वय १७ वर्षे) या दोन अल्पवयीन मुली ‘क्लासला जातो’ असे सांगून बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर अपहरणाचा संशय लक्षात घेऊन तपास सुरु करण्यात आला.
तपासादरम्यान बार्शी पोलिसांनी लातूर बसस्थानक परिसरातून दोन्ही मुली आणि एक संशयित तरुणाला, तसेच बार्शी शहरातून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सुमित लालासाहेब लोमटे (वय २१) आणि नितीन हरिदास मोरे (वय १९, दोघेही रा. घारगाव, ता. परांडा) अशी असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपहृत मुलींना वैद्यकीय तपासणीअंती सोलापूर येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत खराडे,पोकॉ अविनाश पवार, राहुल उदार व महिला पोकॉ आरती कसबे यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
बार्शी पोलिसांची ही जलद व परिणामकारक कारवाई म्हणजे त्यांच्या दक्षतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्तम नमुना आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कुणाकडेही संबंधित माहिती असल्यास बार्शी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
