दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
दावोस : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समान औद्योगिक विकासासाठी नवीन प्रकल्पांचे नियोजन करण्याची मागणी केली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील छोट्या जिल्ह्यांमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेच्या निमित्ताने दावोस (स्वित्झर्लंड) येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने उभारलेल्या ‘इंडिया पॅव्हेलियन’बरोबरच महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ उभारले आहे. या पॅव्हेलियनमध्ये गुंतवणूकदारांना महाराष्ट्रातील औद्योगिक संधी, धोरणे आणि शासकीय सुविधांची माहिती देण्यात येत आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी हेही दावोस येथे या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यंदाच्या दावोस दौऱ्यात विक्रमी गुंतवणूक करार निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावर्षी महाराष्ट्र सरकारने ३० लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार करून आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून, यामुळे जागतिक उद्योगविश्वाचे लक्ष महाराष्ट्राकडे वेधले गेले आहे.
दावोस येथे विविध देशांचे स्वतंत्र पॅव्हेलियन उभारण्यात आले असून इंडिया पॅव्हेलियनमध्ये भारतातील विविध राज्यांचे विभाग आहेत. मात्र महाराष्ट्राच्या स्वतंत्र पॅव्हेलियनमध्ये सर्वाधिक गर्दी होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असल्याचे ललित गांधी यांनी नमूद केले. १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन झाल्यापासून २३ जानेवारीपर्यंत सर्वाधिक भेटी घेण्यात आलेले पॅव्हेलियन म्हणून महाराष्ट्र पॅव्हेलियनचा उल्लेख करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
विविध सत्रांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील औद्योगिक धोरणाची मांडणी केली असून, ती गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर ललित गांधी यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत सांगितले की, दावोस येथे निश्चित झालेल्या नव्या गुंतवणुकीचा लाभ केवळ काही निवडक जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येतील, असे नियोजन शासनाने करावे.
विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प उभारणे विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील लहान जिल्ह्यांमध्येही गुंतवणुकीचे प्रकल्प आणणे राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सर्व भागांमध्ये संतुलित औद्योगिक विकासासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, आर्थिक सल्लागार कौस्तुभ धावसे, उद्योग खात्याचे सचिव पी. अनबलगन, उद्योग आयुक्त दिपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच स्वित्झर्लंडमधील भारतीय उद्योजक यशोधन रामटेके आणि क्रिडाई इंडियाचे संचालक हिरेन परमार यांच्यासह अन्य मान्यवरांनीही या बैठकीला उपस्थिती लावली.
















