६०० ते ७०० शेतकऱ्यांचा सहभाग : खवा उद्योग व केळी उत्पादनाला नवी दिशा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रामहारी मंगल कार्यालय’, भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन तसेच केळी पीक परिसंवाद २०२६ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी, खवा उत्पादक व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भूम व वाशी परिसरातील खवा उद्योगाला व्यापक बाजारपेठ मिळावी व जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नामांकित खवा खरेदीदार व स्थानिक उत्पादक एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
यावेळी खव्याची गुणवत्ता टिकवणे, स्वच्छ व हायजिनिक पॅकेजिंग, तसेच ब्रँडिंगवर विशेष भर देण्यात आला. उत्पादकांना थेट व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने भविष्यात दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘केळी पीक परिसंवाद २०२६’ संपन्न झाला. कृषी विद्यापीठातील तसेच केळी पिकातील तज्ज्ञांनी केळीच्या बागांवर येणारा करपा रोग व ‘सीएमव्ही’ रोग नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निर्यातक्षम केळी उत्पादन कसे घ्यावे आणि जागतिक बाजारपेठेत कसे स्थान मिळवावे, याबाबत तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी, भूम रेवैयाह डोंगरे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले की, “भूम तालुक्याची ओळख केवळ दूध उत्पादक तालुका म्हणून न राहता ‘खवा क्लस्टर’ म्हणून निर्माण व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव राजकुमार मोरे, प्रकल्प संचालक आत्मा धाराशिव विष्णू मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी भूम भागवत सरडे, तहसीलदार भूम जयवंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूम अतूल ढवळे यांनी केले.
सूत्रसंचालन हर्षल यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोशनी भामरे यांनी केले. केळी पीक परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोके, प्रताप गाढवे, रवी गवळी, आबासाहेब जाधव व योगेश म्हसे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच खवा खरेदीदार–विक्रेता संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद जोगदंड व भरत दळवे उपस्थित होते. या कार्यक्रमास अंदाजे ६०० ते ७०० शेतकरी उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे विशेष कौतुक केले आहे.
















