बाणेर पोलिसांची कामगिरी : वडील व भावाकडून पैसे उकळण्यासाठी युवकाचे कृत्य
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या युवकाचे अपहरण करून २ लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यापैकी १० हजार रुपयेही घेतले गेले. मात्र हे अपहरण नसून संबंधित युवकाने वडील व भावाकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे बाणेर पोलिसांनी उघडकीस आणून त्याला अटक केली आहे.
मनिषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी (वय २१, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे या युवकाचे नाव आहे. मनिषकुमार हा बारावीत नापास झाल्यानंतर पुण्यात येऊन बाणेर येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे.
मनिषकुमार हा ९ फेब्रुवारी रोजी गावी जाणार होता. त्याने त्याच दिवशी गावी येत असल्याचे फोन करून सांगितले होते. मात्र रात्री त्याचा फोन बंद लागत होता. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मनिषकुमारच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना व फिर्यादी भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळाला.
त्यामध्ये, “यदि आप अपने बेटे को जिंदा देखना चाहते हो तो तुम्हारे पास छह घंटे हैं, दो लाख रुपये का इंतजाम कर लो। पुलिस को बताने की कोशिश भी की तो वह मारा जाएगा। क्यों रे तुम्हें वह नहीं चाहिए? अगर छह घंटे में पैसे नहीं मिले तो हम भाई को मार देंगे,” असा धमकीचा मेसेज पाठविण्यात आला होता.
भावाच्या जीवाला धोका असल्याचे वाटल्याने त्याच्या भावाने पुण्यात येऊन बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष पथक गठित केले. आरोपी व अपहृत व्यक्तीची सतत तांत्रिक माहिती काढण्यास पथकातील अधिकारी व अंमलदारांना सूचना देण्यात आल्या.
मनिषकुमार द्विवेदी हा घटनास्थळावरून कधी व कुठे गेला, कोणत्या वाहनाने गेला याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. त्यामध्ये तो एकटाच रिक्षाने शहरात फिरत असल्याचे आढळून आले. तसेच म्हाळुंगे येथील एका सोसायटीमध्ये तो ९, १० व १२ फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्राकडे एकटाच अनेकदा ये-जा करत असल्याचेही आढळले. दरम्यान, त्याच्या भावाने मनिषकुमारच्या खात्यावर १० हजार रुपये पाठविले होते.
मनिषकुमार २३ फेब्रुवारी रोजी पुण्यात आल्यावर त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने वडील व भावाकडून पैसे मिळावेत या उद्देशाने हे कृत्य केल्याचे कबूल केले. युवकाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून त्याचे खंडणीसाठी अपहरण झाले असल्याची खोटी माहिती नातेवाईकांना दिली होती आणि त्यांच्याकडून खंडणीची अग्रीम रक्कम म्हणून १० हजार रुपये ऑनलाइन घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलूमुला, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक व स्वप्नील मराठे यांनी केली.
दारूच्या नशेत अपहरणाचा रचला बनाव
पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार त्याचे अपहरण खंडणीसाठी झाले नसावे, असे त्याच्या वर्तनावरून व हावभावावरून दिसून येत होते. मनिषकुमार नंतर अहमदाबाद येथे गेला होता तसेच तेथून तो प्रयागराज येथे गेल्याचे तपास पथकाला आढळून आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव व पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे हे प्रयागराज येथे गेले. तेथे माहिती घेतली असता मनिषकुमार हा बारावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी दुसऱ्या गावात गेल्याचे समजले. दरम्यान, त्याने दारूच्या नशेत पैसे मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे गावी गेल्यावर नातेवाईकांना सांगितले होते. त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याला पुण्यात आणण्यास सांगण्यात आले. तो पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
















