‘सूर्यदत्त’मध्ये महाराष्ट्रातील पहिले अधिकृत प्रशिक्षण केंद्र : ९ व १० मार्चला महा हॅकफेस्टचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात घेता सायबर सुरक्षेच्या प्रगत प्रशिक्षणासाठी सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संचालित सूर्यभारत ग्लोबल प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अमेरिकास्थित ‘माईल-टू’ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत ‘सूर्यदत्त मिशन – सायबर फॉर ऑल’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बेसिक ते प्रगत स्तरावरील सायबर सुरक्षा प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पीवायसी जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि ‘माईल-टू’चे प्रमुख डॉ. रेमंड फ्रेडमन (ऑनलाईन) तसेच एशिया हेड अरिंदम पॉल यांनी केली.
यावेळी सामंजस्य कराराचे आदानप्रदानही करण्यात आले. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संगणक विभागाच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार, जनसंपर्क व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे आदी उपस्थित होते.
डॉ. रेमंड फ्रेडमन म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत सायबर क्राईम आणि सायबर फसवणुकीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मोबाईल व इंटरनेट वापरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरातील लोक सायबर गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत.
त्यामुळे सायबर सुरक्षा हा मुद्दा जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठरला आहे. ‘माईल-टू’च्या माध्यमातून जगभरातील विविध देशांतील सरकारे, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सायबर सुरक्षेशी संबंधित विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. पुण्यात ‘सूर्यदत्त’ संस्थेसोबत महाराष्ट्रातील पहिले सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे.”
प्रा. डॉ. मनीषा कुंभार म्हणाल्या, “क्लाऊड, डेटा आणि वेब या सर्व क्षेत्रांमध्ये सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिकुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे ही कमतरता भरून निघण्यास मदत होईल.”
अरिंदम पॉल यांनी ‘माईल-टू’च्या भारतातील विस्ताराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर ‘माईल-टू’कडून ३५ अभ्यासक्रम चालविले जातात. भारतात आम्ही २७ शैक्षणिक संस्थांशी थेट संलग्न आहोत, तर २८ ठिकाणी प्रशिक्षण भागीदार म्हणून कार्यरत आहोत. या सर्व ठिकाणी सध्या सायबर सिक्युरिटीचे १४ प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू आहेत.”
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना सायबर गुन्हेगारीतही वाढ होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेबाबतची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये ग्लोबल सायबर सिक्युरिटी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यात येणार असून, त्यामार्फत समुपदेशन व मार्गदर्शन केले जाणार आहे. सायबर सुरक्षा आणि एआय क्षेत्रातील ३० हून अधिक बेसिक ते प्रगत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी प्रवेश परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. यशस्वी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व प्लेसमेंट सपोर्टही दिला जाणार आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















