महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शीचे ॲड. विकास जाधव यांची सरकारकडे मागणी
बार्शी : ग्रामविकासाचे अभ्यासक तथा हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना राज्यसभेवर तर पाटोदा येथील आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या संघटनांच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या तसेच ग्रामपंचायतींच्या विविध समस्या मांडण्यासाठी विधान परिषद व राज्यसभेत प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी ते यापूर्वीपासून आग्रही आहेत. तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असणारा स्वतंत्र विभागवार विधान परिषदेचा मतदारसंघ निर्माण करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
सध्या राज्यसभा व विधान परिषदेच्या काही जागा रिक्त असून त्या जागांसाठी आमदारांमार्फत निवडणूक होणार आहे. राज्यातील सर्व आमदारांना सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून दिले असल्याने पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
पोपटराव पवार व भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे कार्य केले आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून ग्रामीण महाराष्ट्रासाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
ग्रामीण महाराष्ट्राच्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याने सरकारमधील तिन्ही पक्षांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शासन सकारात्मक निर्णय घेऊन राज्यसभेवर पोपटराव पवार व विधान परिषदेत भास्करराव पेरे पाटील यांची निवड होईल, अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली.
















