खराडी पोलिसांनी काही तासांत खंडणीखोरांना पकडून व्यावसायिकाची केली सुटका
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडी क्रशर प्लांट दाखविण्याच्या बहाण्याने मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना खराडी पोलिसांनी काही तासांत पाठलाग करून पकडले आणि व्यावसायिकाची सुटका केली.
सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता खराडी येथील इराणी कॅफे ते पेरणे फाटा दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांचा ‘आनंद स्काय इन्फोटेक’ या नावाने व्यवसाय आहे.
रेल विकास निगम लिमिटेडच्या वतीने त्यांची कंपनी मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्कचे काम करत आहे. जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान आकुर्डी येथील रेल विकास निगमच्या कार्यालयात त्यांची सागर झुरुंगे यांच्याशी ओळख झाली.
झुरुंगे हा खडी स्टोन क्रशर मालाचा पुरवठा करतो. त्यांच्या कंपनीकडून ४५ दिवसांच्या क्रेडिटवर माल घेतला जात होता आणि त्यानुसार बिल दिले जात होते. सागर झुरुंगे याचे ५० लाख रुपयांचे बिल बाकी होते.
१३ एप्रिल रोजी सकाळी सागर झुरुंगे याने फिर्यादी यांना फोन करून सिव्हिल कन्स्ट्रक्शनसंदर्भात बोलणी करायची आहेत, असे सांगून भेटण्याची वेळ ठरवली. त्यानुसार १४ एप्रिल रोजी ते आपल्या फॉर्च्युनर गाडीसह इराणी कॅफेमध्ये भेटले. त्यांच्यासोबत त्यांचा चालक संतोष विश्वकर्मा हाही होता. झुरुंगे याने क्रशर प्लांट पाहायला जाऊ या असे सांगितले.
यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्यांना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून खराडी जकात नाका येथील क्रशर पॉइंटवर नेले. तेथे झुरुंगे यांच्यासोबत एका कंटेनरमध्ये बसविण्यात आले. त्यांच्यासोबत झुरुंगे याचे आणखी तीन साथीदार आले. त्यावेळी सागर झुरुंगे याने ५० लाख रुपयांची मागणी करून “हे पैसे आजच पाहिजेत,” असे सांगितले.
फिर्यादी यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद करून ठेवण्यात आले. त्यानंतर झुरुंगे याचे आणखी तीन साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना “पैसे देऊन टाका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत दमदाटी केली.
“जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील,” असे सांगून त्यांना कंटेनरमधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा फॉर्च्युनर गाडीत बसवून पुणे-अहिल्यानगर रोडने रांजणगावच्या दिशेने नेण्यात आले.
दरम्यान, झुरुंगे याने गाडी एका नव्या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर उभी केली. तेव्हा दुसरी फोर्ड एंडेवर गाडी तेथे आली. त्या गाडीत फिर्यादी यांना बसवून अज्ञात ठिकाणी नेले जात असताना पेरणे फाटा येथील जयस्तंभाजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून त्यांना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अशी झाली कारवाई
सागर झुरुंगे याने फिर्यादी यांच्या वडिलांना फोन करून “५० लाख रुपये मिळाले नाहीत तर तुमच्या मुलाला सोडणार नाही,” अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या वडिलांनी चालकाकडे चौकशी केली असता, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून त्यांना घेऊन गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. खराडी पोलिसांनी तत्काळ हालचाल करून संबंधित फॉर्च्युनर गाडीचा शोध सुरू केला. पुणे-अहिल्यानगर रोडवरील जयस्तंभाजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी फिर्यादी यांना घेऊन जाणारी गाडी आढळून आली. फिर्यादी यांनी पोलिसांना अपहरणाची माहिती दिल्यानंतर गाडीत असलेल्या ५ जणांना अटक करण्यात आली.















