संजय राठोड यांच्या हस्ते ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ‘जलस्रोतांची मर्यादा, पाणीटंचाई यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी असेल तरच शेतीची उन्नती होते. त्यामुळे पाणी अडवणे-साठवणे, तलावांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना सर्व गावांमध्ये प्रभावीपणे आणि कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली शासनाने घेतला आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण’ अर्थात www.shiwaar.com या पोर्टलचे उद्घाटन संजय राठोड यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, एमडी कोमल जैन, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मृद व जलसंधारण अधिकारी तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
राठोड पुढे म्हणाले, ‘शासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था जलसंधारणाची कामे करत आहेत. शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्त्वाखाली बीजेएसने हे उपयुक्त पोर्टल तयार करून जलसंधारण विभागाला सुपूर्द केले आहे.
या योजनेचा उद्देश, पात्रता, निकष, प्रशिक्षण यासंबंधी संपूर्ण माहिती एका क्लिकवर पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे. याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे.’
‘राज्यातील सर्व सरपंच, शेतकरी, गावकरी यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेत आपल्या गावांमध्ये या योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लागणार आहे.
निधीची कुठेही कमतरता पडणार नाही, कारण तो थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच वर्ग करण्यात येईल,’ असेही राठोड यांनी सांगितले. गणेश पाटील यांनी या योजनेची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट केले.
शांतिलाल मुथ्था यांनी या पोर्टलची निर्मिती, त्याची उपयुक्तता आणि शेतकरी-सरपंचांसाठी असलेले महत्त्व थेट प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. तर नंदकिशोर साखला यांनी उपस्थितांचे आभार मानले.
