आपच्या निखिल खंदारे यांचे संजय सिंग यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 नवसमाविष्ट गावांमधील पाणीटंचाई, शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याची मागणी आम आदमी पार्टी पुणेचे युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे यांनी खासदार संजय सिंग यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे.
2017 व 2021 मध्ये एकूण 34 गावांचा समावेश PMCमध्ये करण्यात आला. त्यापैकी उंड्री, पिसोळी, येवलेवाडी यांसारख्या 32 गावांमध्ये आजही केवळ 5 ते 10 टक्केच पाणी PMCकडून पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतो.
याशिवाय या भागांमध्ये शासकीय शाळा व सार्वजनिक आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या असून, नागरिकांना महागड्या खासगी शाळा व रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागतो. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत चालला आहे.
PMC निवडणुका रखडल्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलेला प्रतिनिधीच उपलब्ध नाही. केंद्र, राज्य व PMC – तिन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असतानाही मूलभूत सुविधा देण्यात अपयश येत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निखिल खंदारे यांनी खासदार संजय सिंग यांना या समस्यांवर राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नवसमाविष्ट गावांना तातडीने सार्वजनिक जलपुरवठा, शासकीय शिक्षण, आरोग्य सुविधा व इतर नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
