जैन समाजाच्या विविध संघटनांचा सहभाग : दोषींवर कठोर कारवाईची मागणी
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ पुण्यातील धनकवडी येथे वर्धमान जैन स्थानक, बालाजी नगर आणि अरीहंत सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कॅंडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.
काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात भारतवासी बंधू-भगिनींना आपला जीव गमवावा लागला. या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यातील धनकवडी येथे वर्धमान जैन स्थानक, बालाजी नगर आणि अरीहंत सोशल ग्रुप यांच्या वतीने कॅंडल दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात अभय छाजेड, नगरसेविका अश्विनी ताई भागवत, अभय संचेती, अक्षय जैन, संपत बोथरा आणि प्रकाश दर्डा यांनी उपस्थित राहून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पहलगाम येथील या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. अशा अमानुष कृत्यांनी मानवतेला काळिमा फासला असल्याचे त्यांनी नमूद केले.
निष्पाप नागरिकांवर झालेला हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. हिंसेने कोणतीही समस्या सुटत नाही, तर ती अधिक गंभीर बनते, असे त्यांनी सांगितले. देशाच्या एकतेस आणि शांततेस धोका पोहोचवणाऱ्या हिंसक प्रवृत्तींचा सर्वांनी एकजुटीने विरोध करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
या कठीण प्रसंगी सर्व उपस्थितांनी पीडित कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केली आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी जैन समाजातील सुरेश लोढा, विजय नवलखा, शशिकांत चोरडिया, संजय लोढा, हरकचंद देसरडा, योगेश लुनिया, मनोज बोरा, धीरज लोढा, राजेंद्र गुगळे, राजेंद्र पोखरना, कुंतीलाल लोढा आणि संजीव लुणावत यांचाही उपस्थिती लाभली.
