मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग : शांततेत व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक पार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : पवन श्रीश्रीमाळ – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा येथे ग्रामदैवत हनुमान देवाची यात्रा दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी डॉल्बी मुक्त वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल रोजी किर्तन व भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, तळेहिप्परग्यातील यात्रा पंच कमिटी आणि ग्रामस्थांनी डॉल्बीचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात, शांततेत आणि वेळेवर संपन्न झाली.
विशेष म्हणजे, तळेहिप्परग्यातील हनुमान यात्रेचा काठीचा मान गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजातील उस्मान शेख यांच्याकडे आहे. नाशिक येथे फरशीच्या दुकानात कार्यरत असलेल्या उस्मान शेख यांनी यात्रेसाठी एक महिना आधी गावात येऊन काठी सजवून धार्मिक सौहार्दाचे उत्कृष्ट उदाहरण साकारले.
यात्रा यशस्वीतेसाठी रतिकांत पाटील (छावा संघटना, उत्तर सोलापूर) तसेच पंच कमिटीचे सदस्य — विठ्ठल रेवजे, उस्मान शेख, तानाजी सुरवसे, अभिजित पाटील, सुमित सावंत, आणि शशिकांत स्वामी — यांचे मोलाचे योगदान लाभले.
यात्रेच्या शांततेत पार पाडल्याबद्दल मा. दीपक चव्हाण (अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण) आणि पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या हस्ते पंच कमिटीच्या सदस्यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भविष्यातही असेच डॉल्बीमुक्त आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. यात्रेदरम्यान डॉल्बीच्या आवाजामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना टाळत, शांततामय आणि आरोग्यदायी सण साजरा करून तरुणांसाठी एक आदर्श निर्माण करण्यात आला आहे, असे मत दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले
यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संकेत देवळेकर व दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे, पोसई घोडके, सपोफौ बानेवाले, पोहेकॉ नागेश कोणदे व मनोज भंडारी यांनी काटेकोर बंदोबस्त राखला होता.
