कासार आंबोली गावातील रिंगरोडच्या मार्गात बदल : शासनाची सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पात आता मोठा बदल करण्यात आला असून, त्यामुळे शासनाला सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे अनेकांची घरेही पाडली जाणार नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित रिंगरोडबाबत विविध चर्चा सुरू आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या या वर्तुळाकार मार्गात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
पश्चिम भागातील कासार आंबोली गावातून जाणाऱ्या रिंगरोडच्या मार्गात सुधारणा करत नवा पर्याय सुचवण्यात आला आहे. पूर्वीच्या नकाशानुसार, एका बांधकाम प्रकल्पातील काही इमारती रिंगरोडच्या मार्गात येत होत्या.
त्यामुळे त्या इमारती पाडाव्या लागणार होत्या. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नव्या मार्गाची आखणी करत त्या इमारती वगळून नवा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
या नव्या मार्गामुळे महामंडळाला सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार असून, रहिवाशांनाही आपली घरे सोडावी लागणार नाहीत. संबंधित बांधकाम प्रकल्पात सुमारे ३०० हून अधिक सदनिका आहेत.
यातील केवळ काहीच भाग रिंगरोडच्या मार्गात येत होता. त्यामुळे न्यायालयात ग्राहकांच्या मागण्या परवडणाऱ्या नसल्याचे सांगत महामंडळाने रिंगरोडची आखणी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झाल्यामुळे केवळ शासकीय खर्च कमी होणार नाही, तर नागरिकांवर होणारा परिणामही टळणार आहे. यामुळे हा बदल अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह ठरत आहे.
