बेकायदा कागदपत्रांद्वारे वास्तव्य : एटीएसची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात बेकायदा वास्तव्य, तसेच परकीय नागरिक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजमीर आणि मोहम्मद हे मूळचे बांगलादेशातील असून, ते ओतूर परिसरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती.
त्यानंतर एटीएस व ओतूर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मोबाईल संच, तसेच कालबाह्य झालेले बांगलादेशी पारपत्र आणि व्हिसाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, हवालदार शरद जाधव, तांदळवाडे आणि त्यांच्या पथकाने केली.
पंधरा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य
आरोपी ताजमीर आणि मोहम्मद हे ओतूर परिसरात रंगारी म्हणून काम करत होते. गेले पंधरा वर्षे ते दोघेही ओतूर परिसरात बेकायदा वास्तव्य करत होते. त्यांनी भारतात घुसखोरी कशी केली, यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी एटीएसच्या पथकाने पिंपरी-चिंचवड शहर तसेच चाकण परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पकडले होते. पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करून बांगलादेशी महिलांना अटक केली होती. तसेच स्वारगेट येथील महर्षीनगर परिसरातून एका बांगलादेशी नागरिकाला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
